संगमनेर:
नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा मूळ प्रस्तावित संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी आता संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या लढ्यात सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या हक्काच्या रेल्वे मार्गासाठी आवाज उठवला आहे. यामुळे या मागणीला आता खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले असून, तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग संगमनेर, नारायणगाव आणि खेड असा व्हावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातूनच हा मार्ग मंजूर झाला होता आणि तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रेल्वेच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आला. रेल्वे मार्ग बदलण्याच्या या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने तीव्र करण्यात आली आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी याप्रश्नी ठाम भूमिका घेत, ही रेल्वे नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–नारायणगाव मार्गेच पुण्याला जावी, अशी मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी घारगाव येथे सर्व लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक घेऊन शासनाकडे जनतेच्या भावना पोहोचवल्या आहेत. लोकशाही मार्गाने आपला लढा अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी नागरिकांना पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
विकासाचा समतोल राखण्यासाठी हा मार्ग संगमनेरमधूनच नेणे तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या मागणीसाठी बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या पत्र मोहिमेमुळे शासन आता या मूळ प्रस्तावित मार्गाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






