संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून राजकारण तापले असून, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्र्यांच्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला आणि कोणता नकाशा दाखविला, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे.
संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकल्पातील संदिग्धतेवर प्रहार केला. थोरात म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा या भागाच्या विकासासाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० मध्ये या प्रकल्पाला मोठी गती देण्यात आली होती. सेंट्रल रेल्वेने डीपीआर मंजूर केल्यानंतर नाशिक-सिन्नर-संगमनेर-साकूर-आळेफाटा-राजगुरुनगर-चाकण-हडपसर-पुणे असा सरळ मार्ग निश्चित झाला होता.
मंत्रिमंडळाची मान्यता मिळून भूसंपादनासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचे वाटपही सुरू झाले होते. ही प्रक्रिया माझ्या उपस्थितीत आणि साक्षीने झाली होती. सरकारने साडेतीनशे कोटी रुपये मोघम म्हटले होते का, जेव्हा रेल्वेचे मार्ग तयार होत होते, तेव्हा या सर्व अडचणींचा सारासार विचार झालेला होता. त्यातून व्यवस्थित मार्गही काढलेले होते. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर अचानक जीएमआरटीचे कारण पुढे करून मार्ग बदलण्याचे प्रयत्न का होत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी सर्व तांत्रिक अडचणींचा विचार करूनच मार्ग निश्चित झाला असताना आताच ही कारणे कशी काय समोर येत आहेत, याचा उलगडा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या या रेल्वे प्रकल्पासाठी तीन पर्यायी मार्ग चर्चेत आहेत. त्यापैकी दोन मार्ग संगमनेर आणि अकोले तालुक्यातून जाणारे आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून प्रस्तावित असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली, ही आनंदाची बाब असली तरी त्यांनी नेमक्या कोणत्या मार्गाचा पाठपुरावा केला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पालकमंत्र्यांनी संगमनेरच्या जनतेला तो नकाशा दाखवावा, जेणेकरून लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल. संगमनेरची रेल्वे ही येथील जनतेच्या अस्मितेचा विषय असून, मार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा इशाराही थोरात यांनी दिला.
नाशिक, मुंबई आणि पुणे हा ‘गोल्डन ट्रँगल’ असून या भागात सर्वाधिक उद्योग आणि रोजगार आहे. त्यामुळे नाशिक आणि पुणे थेट रेल्वेने जोडणे ही व्यापार आणि शेतीची मोठी गरज आहे. सरळ मार्गाऐवजी ‘वाकडी वाट’ धरल्यास ते विकासाला परवडणारे नाही. हा विषय राजकारणाचा नसून या परिसराच्या पुढील १०० वर्षांच्या भविष्याचा आहे. जर आज हा प्रकल्प मार्गी लागला नाही, तर पुढील ५० वर्षे तो होणे कठीण आहे, अशी भीती व्यक्त करत थोरात यांनी या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले.
नाशिक-पुणे रेल्वेसाठी पालकमंत्र्यांनी कोणता नकाशा सुचविला? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रोखठोक सवाल
सरळ मार्गाऐवजी 'वाकडी वाट' धरल्यास ते विकासाला परवडणारे नाही. हा विषय राजकारणाचा नसून या परिसराच्या पुढील १०० वर्षांच्या भविष्याचा आहे. जर आज हा प्रकल्प मार्गी लागला नाही, तर पुढील ५० वर्षे तो होणे कठीण आहे, अशी भीती व्यक्त करत थोरात यांनी या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले.





