संगमनेर: प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत आणि व्यापारी केंद्र असलेल्या संगमनेर शहराला आता ‘स्मार्ट’ आणि ‘शिस्तबद्ध’ बनवण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यामुळे संगमनेर करांच्या दैनंदिनी मध्ये एक महत्त्वाचे वळण येणार आहे. ‘संगमनेर २.०: इट्स टाइम टू अपग्रेड’ या विशेष मोहिमेद्वारे शहराचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला असून, येत्या १ मार्च २०२६ पासून शहरात नवीन आणि कडक नियमावली लागू केली जाणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी शहरवासीयांना, व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना शहराच्या सुव्यवस्थेसाठी मनापासून सहकार्य करण्याचे भावूक आवाहन केले आहे.
शहरातील वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ (फुटपाथ) मोकळे असणे ही काळाची गरज बनली आहे. यावर भाष्य करताना डॉ. तांबे म्हणाल्या की, दुकानांसमोरील अनधिकृत ओटे, शेड आणि रस्त्यावर येणारे फलक यामुळे नागरिकांना चालणे कठीण होते. हे अतिक्रमण व्यापाऱ्यांनी स्वतःहून आणि स्वयंस्फूर्तीने काढून घ्यावे, जेणेकरून प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची वेळ येणार नाही. रस्ते मोकळे झाल्यास ग्राहकांना फिरणे सोपे होईल आणि शहराची बाजारपेठ अधिक शिस्तबद्ध दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘स्वच्छ संगमनेर’ हे स्वप्न साकारण्यासाठी कचरा व्यवस्थापनात शिस्त आणणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आता प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक कर्तव्य आहे, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच, उघड्या भूखंडांचे मालक आणि रहिवासी यांनी आपापला परिसर स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही रोजची समस्या बनली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हॉस्पिटल, मोठी दुकाने आणि व्यावसायिक संकुलांनी स्वतःची पार्किंग व्यवस्था करणे आता अनिवार्य असेल. विनापरवाना पार्किंगमुळे होणारा अडथळा दूर करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन नियम लागू केले जाणार आहेत. तसेच, शहराचे सौंदर्य खराब करणारे अनधिकृत होर्डिंग्स, पोस्टर्स आणि बॅनरबाजीला आता चाप लावला जाणार असून, नवीन बांधकाम परवानगीबाबतही पारदर्शकता आणि शिस्त पाळली जाणार आहे.
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजी-फळ विक्रेते, पान टपरी आणि इतर व्यावसायिकांसाठी ‘हॉकर्स झोन’चे नियम कडक करण्यात आले आहेत. प्रत्येक विक्रेत्याला ओळखपत्र लावणे अनिवार्य असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, नियमांचे पालन करून व्यवसाय केल्यास प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही देखील नगराध्यक्षांनी दिली आहे.
संगमनेरचे भवितव्य घडवण्याची ताकद आपल्या प्रत्येकाच्या सहभागात आहे, असा संदेश देत डॉ. मैथिली तांबे यांनी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या या बदलाच्या पर्वात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांनी हातात हात घालून काम केल्यास संगमनेर शहर महाराष्ट्रातील एक ‘मॉडेल सिटी’ म्हणून नावारूपास येईल. हा उपक्रम संगमनेरच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार असून, शहरवासीयांनी आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून या ‘मिशन २.०’ ला यशस्वी करावे, ही माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आपलं शहर, आपली शिस्त! ‘संगमनेर २.०’ साठी नगराध्यक्ष नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांची साद; आता बदलाची वेळ आलीय! १ मार्चपासून…
प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांनी हातात हात घालून काम केल्यास संगमनेर शहर महाराष्ट्रातील एक 'मॉडेल सिटी' म्हणून नावारूपास येईल. हा उपक्रम संगमनेरच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार असून, शहरवासीयांनी आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून या 'मिशन २.०' ला यशस्वी करावे, ही माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





