संगमनेर, प्रतिनिधी –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज संगमनेर शहरात अत्यंत उत्साही वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व फुले अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत त्यांच्या विचारांचे स्मरण याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे स्वराज्य स्थापनेतील अतुलनीय योगदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय व समतेसाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकला. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे आहेत, असा सूर याप्रसंगी उमटला.
या सोहळ्याला विहिंप प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख धनाजी शिंदे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, विशाल वाकचौरे, सुरेंद्र महाले, सचिन कानकाटे, शुभम मुर्तडक, योगेश मखाना, तुषार ठाकूर, प्रसाद घोगरे, अश्विन बेल्हेकर आणि अजिंक्य डोंगरे यांसह अनेक मान्यवर व शिवप्रेमी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.




