महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला भव्य जीर्णोद्धार आणि वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित असलेला बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान आगामी काळात संगमनेर तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे यांच्यासह मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र, या पवित्र कामात लोकसहभाग असणेही तितकेच गरजेचे आहे. आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या विकास निधीमुळे या परिसराचा कायापालट झाला असून, जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यावर या तीर्थक्षेत्राची भव्यता आणि पावित्र्य अधिक वृद्धिंगत होईल. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राजस्थानमधील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे निझर्णेश्वर परिसरात पर्यटकांचा ओघ वाढणार असून, त्यातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन आणि मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध विकासकामांसाठी विक्रमी निधी प्राप्त होत आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास होत असून, यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी गती मिळत आहे. निझर्णेश्वर देवस्थानचा हा परिसर भविष्यात जिल्ह्याचे एक महत्त्वाचे विकास केंद्र म्हणून ओळखले जाईल. या कार्यक्रमामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.





