संगमनेर, प्रतिनिधी –
तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने या उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार वाढल्याने शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप वारंवार बंद पडत होते, याचा थेट परिणाम पिकांना पाणी देण्यावर आणि शेती उत्पादनावर होत होता. ही समस्या गंभीर असल्याचे ओळखून आमदार खताळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत ट्रान्सफॉर्मरचे क्षमतेत वाढ केली आहे.
आमदार खताळ यांनी केवळ राजापूरच नव्हे, तर तालुक्यातील इतरही उपकेंद्रांकडे लक्ष केंद्रित केले असून, जिथे गरज आहे तिथे १० एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर २० एमव्हीए करण्यात आले आहेत. या नियोजित बदलांमुळे ट्रान्सफॉर्मरवर येणारा अतिरिक्त ताण आता कायमचा दूर झाला असून शेतकऱ्यांना हक्काची आणि मुबलक वीज मिळणे सुलभ झाले आहे.
आपल्या भागातील शेतकरी कष्ट करून पीक घेतो, मात्र वीज समस्येमुळे त्याचे नुकसान होऊ नये हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत, आगामी काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण कामामुळे राजापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
राजापूर उपकेंद्राची क्षमता दुप्पट; शेतकरी अन् ग्रामस्थांना मोठा दिलासा
आपल्या भागातील शेतकरी कष्ट करून पीक घेतो, मात्र वीज समस्येमुळे त्याचे नुकसान होऊ नये हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत, आगामी काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.





