संगमनेर:
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात घारगाव पोलिसांना मोठे यश आले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, भोजदरी येथील शेतकरी महेश गणपत हांडे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १३ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या शेतातील आणि शेततळ्यातील विद्युत पंप तसेच कॉपरची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाद्वारे महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळंद्री येथील किशोर सुरेश काळे (वय २५), सागर सुरेश काळे (वय २३) आणि अनिल देमाभाऊ काळे (वय २७) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनीही घारगाव परिसरात अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने घारगाव पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यात गु.र.नं. २४/२०२६, १४/२०२६, २२/२०२६, २३/२०२६ यांच्यासह अनेक अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दिपक भोर, राम गवांदे, रविंद्र गुंजाळ, भाऊ तळपे, गोरक्षनाथ कडाळे, उत्तम निमसे आणि संतोष निमसे यांच्या मालकीची शेकडो फूट कॉपर केबल हस्तगत करण्यात आली आहे.
तसेच, नवनाथ सागर, निलेश सागर, रोहित आहेर, सुरेश भुतांबरे, महेश हांडे, सुभाष गुळवे आणि सिताराम गुळवे यांचे ५ एचपी व २.५ एचपीचे विद्युत पंपही जप्त केले आहेत. याशिवाय भास्कर गुळवे आणि ज्ञानेश्वर नाईकवाडी यांची केबलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अदखलपात्र गुन्ह्यांच्या तपासात भरत पाबळे, लक्ष्मण तिटाकरे, अमोल कहाणे, सुभाष घोडे, शिवाजी उगले आणि रामदास भुतांबरे यांचेही विद्युत पंप मिळून आले आहेत.
धक्कादायक म्हणजे या टोळीने संदीप वाळुंज यांचा फिलीप्स कंपनीचा एलईडी टीव्ही आणि बेलापूर येथून एक्साईड कंपनीची ट्रॅक्टर बॅटरी देखील चोरली होती.
जप्त केलेला हा सर्व मुद्देमाल ज्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला, त्यामध्ये चैतन्यपूर येथील दत्तात्रय किसन हुलावळे, बाळंद्री येथील देवराम ज्ञानदेव मधे, गोरख ज्ञानदेव मधे, अशोक अंकुश मधे, विशाल सुखदेव दुधवडे, अशोक सोंत्या दुधवडे, रविंद्र बबल्या केदारी, नितीन संजय दुधवडे तसेच अकलापूर येथील दिपक पवार, येठेवाडीचे रामदास काशिनाथ वाडगे आणि आळे-रामवाडी येथील तुषार बाळू काळे यांचा समावेश आहे. या सर्वांकडून चोरीचे पंप आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
ही यशस्वी कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हवालदार बी. वाय. गोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, सुरेश शेळके, अनिल भांगरे, महादेव हांडे, रोहिदास आंधळे, चालक चंद्रकांत मेढे आणि श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हवालदार सचिन धनाड यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.





