संगमनेर | अनंत पांगारकर
सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानाची नितांत गरज आहे. या महापुरुषांचे विचार पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक असून, त्यांना नाकारणे म्हणजे आधुनिक भारताच्या अस्तित्वालाच नाकारण्यासारखे आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.
संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’तील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. “गांधी, नेहरू का नकोत?” या विषयावर रविवारी व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या व्याख्यानासाठी जनसमुदायाची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय थोरात होते, तर व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि मंचाचे समन्वयक संदीप काकड उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात आवटे यांनी गांधी आणि नेहरूंच्या योगदानावर प्रकाश टाकताना सांगितले की, आज या महापुरुषांवर होणारी टीका ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची नसून ती एका विशिष्ट विचारसरणीला संपवण्यासाठी रचलेला पद्धतशीर कट आहे. गांधीजींची अहिंसा आणि नेहरूंची वैज्ञानिक दृष्टी आजच्या द्वेषाच्या राजकारणात अडथळा ठरत असल्यानेच त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. नेहरूंचे योगदान केवळ धरणे किंवा कारखाने उभारण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी या देशाला एक प्रगल्भ लोकशाहीवादी संस्कृती दिली. ज्यांना संविधानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये मान्य नाहीत, त्यांनाच गांधी आणि नेहरू नको आहेत.
आवटे यांनी गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या विचारांची सांगड घालताना एक महत्त्वपूर्ण समीकरण मांडले. ते म्हणाले की, गांधी, नेहरू आणि आंबेडकर ही त्या काळातील खरी ‘महाविकास आघाडी’ होती. गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर ‘भारत’ असे हे समीकरण असून, या तिन्ही महापुरुषांच्या विचारांचा एकत्रित वारसा हाच भारताचा खऱ्या अर्थाने डीएनए आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना बळी न पडता तरुणांनी या महापुरुषांचा सत्य इतिहास समजून घेणे ही काळाची गरज आहे.
या व्याख्यानासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. मार्गदर्शक हिरालाल पगडाल, जुबेरभाई इनामदार, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, सीताराम राऊत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. रंजनाताई गवांदे, राष्ट्र सेवा दलाचे दत्ता ढगे, संजय शिंदे, विनोद गायकवाड, अंतोन घोडके, कैफ तांबोळी, सूर्यकांत शिंदे, राम अरगडे, प्रकाश कडलग, श्रीनिवास पगडाल, रजत अवसक, ॲड. गोपीनाथ घुले, श्रीकांत रहाणे, सारंग पांडे, प्रशांत पानसरे, प्रा. सुवर्णा बेनके, ॲड. प्रज्ञा लामखडे, विठ्ठल शेवाळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. समीर लामखडे यांनी केले, तर छात्रभारतीचे प्रदेशाध्यक्ष अनिकेत घुले यांनी प्रास्ताविक केले. शेवटी सत्यशोधक विचार मंचाचे समन्वयक संदीप काकड यांनी आभार मानले.





