मुंबई, विशेष प्रतिनिधी
राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या कोट्यातून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत थोरात यांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा विचार सुरू केला असून, त्यामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आले आहे.
१९८५ ते २०२४ अशी सलग ३९ वर्षे संगमनेरचे आमदार राहिलेल्या थोरात यांचा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला. सलग आठ वेळा निवडून आलेल्या आणि विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवलेल्या या संयमी व मुत्सद्दी नेत्याचे पुनर्वसन करण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. थोरात यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला राज्यात फायदा होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असा विचार पक्षश्रेष्ठींकडून केला जात आहे.
बाळासाहेब थोरात यांची महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी असलेले उत्तम समन्वय व सलोख्याचे संबंध पाहता, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या नावाला संमती मिळणे सोपे जाईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. थोरात हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असून अजातशत्रू नेते म्हणून त्यांची ओळख आहे, ज्यामुळे त्यांच्या नावाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.





