संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिक-पुणे रेल्वे सर्व मार्गे होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र बदल करण्यात आलेला प्रकल्पाच्या माध्यमातून पालकमंत्री संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यांमध्ये वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप करत पालकमंत्र्यांनी या मार्गामध्ये मोडता घालण्याचे काम करू नये असा घणाघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
बुधवारी (२५ फेब्रुवारी) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेली रेल्वेची आखणी तांत्रिकदृष्ट्या योग्य होती. पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि हा प्रकल्प मूळच्या सरळ मार्गानेच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जुन्या आराखड्यात खोडा घालण्याचे काम त्यांनी करू नये, ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडेही लक्ष वेधले. सध्या सुरू असलेला आदिवासींचा मोर्चा हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, सरकारने तातडीने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अत्यंत कळीचा असल्याचे सांगत थोरात यांनी नमूद केले की, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे कर्जमाफीची घोषणा झाली तर त्याचे स्वागतच होईल.
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना थोरात म्हणाले की, अमेरिकेसोबत झालेल्या नवीन व्यापार करारांमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे करार शेती क्षेत्रासाठी अडचणीचे ठरणार असून सरकारने यावर फेरविचार करावा. तसेच कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने सरकार शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशासकीय कारभारावर बोट ठेवताना थोरात यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रशासक राजवटीत मनमानी कारभार सुरू असून लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांवर सरकारकडून दहशत पसरवली जात आहे, असेही ते म्हणाले. सध्या सरकारविरोधी बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असून, एक प्रकारे छळ सुरू आहे. अशा परिस्थितीत जनतेनेच आपला खरा आवाज बुलंद करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पात पालकमंत्र्यांनी मोडता घालू नये; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा घणाघात
सध्या सुरू असलेला आदिवासींचा मोर्चा हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, सरकारने तातडीने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली.





