संगमनेर, प्रतिनिधी – मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती असल्याचे सांगत, तिच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक व कवींना सोबत घेऊन आपण एक ‘संगमनेर पॅटर्न’ तयार करू, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात संगमनेरमधील नामवंत कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी काव्यसंमेलन व मराठी भाषा समृद्धीसाठी विशेष चर्चा झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो, मात्र केवळ उत्सव न साजरा करता मराठी शाळांना अधिक पाठबळ देणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई आणि बहिणाबाई अशी मोठी संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राने ही भाषा समृद्ध केली असून भाषा समृद्धीचा वारसा पुढे सुरू राहायला हवा. दुर्गाताई तांबे यांनी मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी हे या भाषेचे अलंकार असल्याचे सांगून, वाचन मंडळाच्या माध्यमातून संगमनेरमधील वाचन चळवळ अधिक समृद्ध होत असल्याचे नमूद केले. तसेच बाळासाहेब थोरात यांनी आयुष्यभर जपलेल्या वाचन व्यासंगाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या काव्यसंमेलनाची सुरुवात प्रा. बाबा खरात यांनी ‘श्वापदांना भाळणारी माणसे’ या कवितेने केली, तर प्रा. सुरेश परदेशी यांनी ‘बोलतो मराठी, ऐकतो मराठी’ हे गीत सादर केले. कवी अशोक वालझाडे यांच्या ‘आता वय झाले’ या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले. अनिल देशपांडे यांनी ‘मला जगायला सवड कुठे होती’, नंदकुमार बेल्हेकर यांनी ‘मराठी साहित्य नभांगणी उगवला कुसुमाग्रज तारा’, डॉ. कोमल देशपांडे यांनी महिला सबलीकरणावर आधारित ‘तू आज जगून घे’ आणि विनोद राऊत यांनी पावसावर आधारित कविता सादर केली. एजाज मन्सुरी यांनी ‘माय मराठी’, रमेश शिंदे यांनी ‘ओढ गावाकडची’, डॉ. कोमल भास्कर यांनी ‘आसवानी मी मला विझवू कशाला’, अपर्णा दाणी यांनी ‘पंढरीचा राया’, डॉ. विवेक वाकचौरे यांनी ‘जीवनात आता निवांत झालो’ तर आनंद गायकवाड आणि सुविधा आरासिद्ध यांनीही आपल्या रचना सादर करत संमेलनात रंगत आणली. यावेळी व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, कवी अशोक वरुडे, दिलीप उदमले, दीपक टाक, अनुराधा आहेर, रामनाथ सातपुते, प्राचार्य रमेश शिंदे, राजाभाऊ भडांगे, डॉ. कोमल देशमुख, प्रा. सुरेश परदेशी, डॉ. कोमल म्हस्के, रश्मीका मारवाडी, बाळकृष्ण महाजन, डॉ. राहुल हांडे, डॉ. राजेंद्र जोरवर, अनिल सोमणी, पत्रकार गौतम गायकवाड, गोरक्ष मदने, सुभाष भालेराव, सुखदेव गाडेकर, सलीम शेख, राजेश जेधे आदींसह विविध साहित्यिक उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्राप्रमाणेच मराठी साहित्यासाठी दिलेले योगदान मोठे असून, त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपत नेहमीच साहित्यिकांचा सन्मान केल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सोमणी यांनी केले, तर आभार डॉ. नितीन भांड यांनी मानले.