संगमनेर, प्रतिनिधी –
सत्ता आणि पद हे केवळ अधिकार गाजवण्यासाठी नसून ते जनसेवेचे एक पवित्र माध्यम आहे, हाच विचार घेऊन संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअचणी आणि प्रलंबित प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी त्यांनी ‘नगरसेवक आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला असून उद्या येत्या १ मार्चपासून ते प्रभागातील प्रत्येक गल्लीत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
निवडून आल्यानंतर अनेकदा लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संपर्क कमी होतो, अशी तक्रार नागरिकांमध्ये असते. मात्र, योगेश जाजू यांनी याला छेद दिला आहे. मी तुमच्या मताने निवडून आलो असलो, तरी खऱ्या अर्थाने मी तुमचा सेवक आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता किंवा नगरपरिषदेच्या कामात येणारे तांत्रिक अडथळे अशा सर्व विषयांवर आता थेट गल्लीबोळात नागरिकांशी चर्चा होणार आहे.
केवळ कार्यालयात बसून समस्या समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळेच १ मार्चपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात जाजू स्वतः प्रत्येक भागात पोहोचणार आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश हा आहे की, नागरिकांच्या समस्या केवळ कागदावर किंवा अर्जापुरत्या मर्यादित न राहता त्या तातडीने सुटल्या पाहिजेत. ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या संवाद दौऱ्यामुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता येईल आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या जनसंपर्क मोहिमेसाठी प्रभागातील विविध भागांनुसार भेटीची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने नागरिकांमध्येही या उपक्रमाबाबत सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. आपला प्रभाग ‘आदर्श प्रभाग’ बनवण्यासाठी सर्वांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन योगेश जाजू यांनी केले आहे.
‘मी नगरसेवक नाही, तुमचा सेवक’; योगेश जाजू १ मार्चपासून येणार तुमच्या दारी, थेट संवादातून सुटणार प्रभागातील प्रश्न
या मोहिमेचा मुख्य उद्देश हा आहे की, नागरिकांच्या समस्या केवळ कागदावर किंवा अर्जापुरत्या मर्यादित न राहता त्या तातडीने सुटल्या पाहिजेत. ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.





