संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण केली जात असून, भविष्यात स्थानिक तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या सुमारे एक कोटी रुपये निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ‘एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या कामाचा आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह कपिल पवार, प्रमोद राहाणे, जनार्दन आहेर आदीसह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
विखे म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा धरणात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ‘अल निनो’चा संभाव्य धोका लक्षात घेता आगामी जूनमधील पावसाच्या प्रमाणावर आधारित पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्याचा ३१ ऑगस्टपर्यंतचा आढावा घेतला जात असून, योग्य नियोजनामुळेच यंदा तालुक्यात टँकरची गरज भासली नाही. आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून तहानलेल्या गावांचा पाणीप्रश्न सुटल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील महायुती सरकार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना विखे पाटील यांनी हिवरगाव पावसा येथील बंधारा आणि तीन कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्ह्यात संरक्षण उत्पादनासारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत असून, यामुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होत आहे. याच धर्तीवर संगमनेर तालुक्यातही औद्योगिक विकासाचे मोठे जाळे निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील पुलाचा प्रश्न सुटला असून, आता औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्नही तातडीने निकाली काढला जाईल, यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या कार्यक्रमात प्रमोद राहाणे, राजन शिंदे आणि काशिनाथ पावसे यांचीही भाषणे झाली.
संगमनेर तालुक्यात लवकरच औद्योगिक वसाहत उभारणार; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही
आमदार अमोल खताळ म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत.





