मुंबई:
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका रोजगारासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना बसला असून, अनेक तरुण सध्या तिथे अडकून पडले आहेत. हा गंभीर प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.
इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना राज्य शासनाची सध्याची हेल्पलाईन यंत्रणा अपुरी पडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनेक तरुणांनी हेल्पलाईनशी संपर्क होत नसल्याच्या तक्रारी केल्याचे सांगत, राज्य सरकारने या विषयात अधिक सक्रिय होऊन तातडीने स्वतंत्र व प्रभावी हेल्पलाईन सुरू करावी, अशी आग्रही मागणी तांबे यांनी यावेळी केली.
आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या या मुद्द्यावर सरकारची बाजू स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय हालचालींची माहिती दिली. केवळ भारतीय दूतावासावर अवलंबून न राहता राज्य सरकार स्वतःहून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण मदतकार्याची आणि समन्वयाची जबाबदारी मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अडकलेल्या नागरिकांच्या सुलभ संपर्कासाठी एक विशेष व्हॉट्सअॅप क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या संकटकाळात राज्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका व्हावी, यासाठी शासन केंद्र सरकारशी समन्वय साधून वेगाने पावले उचलत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.



इराणमधील तणावात महाराष्ट्राचे तरुण संकटात; स्वतंत्र हेल्पलाईन व समन्वयासाठी आमदार सत्यजीत तांबे यांची सभागृहात मागणी
आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या या मुद्द्यावर सरकारची बाजू स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय हालचालींची माहिती दिली.

