नवी दिल्ली:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी रात्री उशिरा महाराष्ट्रासह देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या मोठ्या फेरबदलामध्ये त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी उपराष्ट्रपती पदी नियुक्ती झालेल्या सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता, मात्र आता राज्याला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत.
संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची आता तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर नंद किशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे. पश्चिम बंगालमध्येही मोठा बदल झाला असून, राष्ट्रपतींनी डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या जागी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांची नियुक्ती करण्यात आली असून, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता तामिळनाडूचे नवे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळतील.
प्रशासकीय स्तरावरही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, तर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांची लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तरनजित सिंग संधू यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या जाहीर
संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.





