शिर्डी:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामध्ये घातपाताची शक्यता वाटत नसली तरी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आज रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका मांडली. केवळ एखाद्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत, त्यांनी संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची तपासणी करण्याची मागणी केली. खराब हवामान असताना उड्डाणाची परवानगी का दिली आणि विमान दुसऱ्या विमानतळावर का वळवले नाही, या प्रश्नांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आठवले यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना सांगितले की, शिर्डीतून खासदार होण्याची त्यांची इच्छा होती, मात्र सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचे सांगतानाच त्यांनी राहुल गांधींवर जाती-जातीत भेद निर्माण केल्याची टीका केली.
तसेच, आगामी काळात अन्य दोन राज्यांत यश मिळवून पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील नगरसेवकांची संख्या आणि ज्योती वाघमारे यांची राज्यसभा निवड यावरून त्यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचे सूतोवाच केले. दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे दोन्ही देशांशी असलेले चांगले संबंध व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.





