संगमनेर, प्रतिनिधी –
रंगपंचमीच्या उत्सवाच्या दिवशीच कॅनलच्या पाण्यात पडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे रविवारी (८ मार्च) सायंकाळी ही घटना घडली.
वाजिद मोहसीन शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. कुरण परिसरातील कॅनलजवळ असताना पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
यानंतर कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वाजिदच्या अशा अकाली जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली आणि तो कॅनलपाशी कसा पोहोचला, याबाबत शहर पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


संगमनेर, प्रतिनिधी –


