नवी दिल्ली :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे.

नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे दर ३०२४ रुपयांच्या आसपास गेले असून कोलकात्यात तर सिलिंडरने ३२०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
निवडणुकांच्या काळात जनतेला दाखवलेली ‘अच्छे दिन’ची स्वप्ने आता हवेत विरली असून, निकालांपूर्वीच सरकारने ही ‘गॅस’बाँबची भेट जनतेला दिली आहे. जरी घरगुती सिलिंडरच्या दरात तूर्तास वाढ केली नसली, तरी त्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्ह असून व्यावसायिक गॅस महागल्याने बाहेरचे जेवण, नाश्ता आणि केटरिंग सेवांच्या दरात मोठी वाढ होणे अटळ आहे.
या दरवाढीचा सर्वाधिक फटका खाद्य उद्योगाला बसणार असून ढाबे आणि छोटे हॉटेल चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. गॅस दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढल्याने साहजिकच हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतीही वधारणार आहेत. परिणामी, महागाईचे हे अप्रत्यक्ष ओझे शेवटी सामान्य ग्राहकाच्याच माथी मारले जाणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर दाखवलेली मेहेरबानी संपवून सरकारने आता सर्वसामान्यांची आर्थिक गणिते उधळून लावली असून, ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.



