संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटी रुपये आणि वेल्हाळे ते राजापूर दरम्यान म्हाळुंगी नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न सुटणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंजूर झालेल्या निधीतून कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५०, चिंचेवाडी-साकूर ते राष्ट्रीय महामार्ग ७१ (मारुती मंदिर), अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक या प्रमुख मार्गांचे काम केले जाणार आहे. तसेच निमगाव बुद्रुक गाव, राजापूर, जोर्वे नाका ते निंबाळे चौफुली, नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापूर, जोर्वे ते वडगाव पान, कवठे कमळेश्वर ते लोहारे, झोळे ते नांदुरी दुमाला, वाघापूर ते जिल्हा महामार्ग (डिग्रस-अंभोरे), चिकणी ते डोंगरगाव, हिवरगाव पठार ते जिल्हा महामार्ग, आणि कोकणगाव ते डोंगरे वस्ती व नवले वस्ती ते जिल्हा महामार्ग या सर्व रस्त्यांच्या विकासाची कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.
या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या या निधीमुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे आता जोमाने होतील. यामुळे केवळ वाहतुकीला गती मिळणार नाही, तर शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळातही तालुक्यातील इतर विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. – अमोल खताळ, आमदार.





