संगमनेर, प्रतिनिधी –
मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील पाणी प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
निळवंडे धरण आणि भोजापूर पूरचारी योजनेचा लाभ न मिळालेल्या गावांच्या व्यथा त्यांनी सभागृहात मांडल्या. विशेषतः सायखिंडी, चिकणी आणि परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून सिंचना अभावी शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
आमदार खताळ यांनी या भागासाठी उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. ग्रामीण भागातील ही तीव्र पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेमुळे केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मतदारसंघातील रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या निधीसाठीही त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, या अधिवेशनातून संगमनेरच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.




