संगमनेर, प्रतिनिधी-
मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी जोरदार आवाज उठवला. संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची गरज याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आमदार खताळ यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये पोलीस निवासस्थानांच्या दुरवस्थेचा प्रश्न अत्यंत कळीचा ठरला. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, ज्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वीही हा प्रश्न शासनासमोर मांडूनही अद्याप ठोस आर्थिक तरतूद न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामांसाठी तातडीने अतिरिक्त निधी देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. तसेच घारगाव पोलीस स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शासनाचे आभार मानतानाच, मुळा नदीलगत असलेल्या या ठाण्यातील इतर पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची मागणीही त्यांनी केली.
केवळ इमारतींचे प्रश्नच नव्हे, तर पोलीस दलाचे आरोग्य आणि मनुष्यबळावरही त्यांनी भाष्य केले. समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तैनात असणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे खताळ म्हणाले. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी पडत असल्याने, प्रत्येक पोलीस ठाण्यात लोकसंख्येनुसार पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
📌 दरम्यान, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली. आंदोलने किंवा राजकीय कारणांमुळे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत शासनाचे सकारात्मक आदेश असतानाही, खालच्या स्तरावरून प्रस्तावांची कार्यवाही रखडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकरणांची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन ती तातडीने निकाली काढण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.





