संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुका व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले कनेक्शन या मुद्द्यांवरून आक्रमक होत युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण विभागाच्या कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राज्यभरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवेळी आणि कमी दाबाने वीज मिळत असल्याने सिंचनासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे.
विशेषतः गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापूर, खांडगाव यांसारख्या अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या अन्यायाविरोधात डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह अजय फटांगरे, पद्माताई थोरात, प्रमिला अभंग आणि सुमारे १०० कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या मांडला.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, राज्यात उष्णतेची लाट असताना नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, मोठ्या भांडवलदारांची वीज बिले माफ करणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णालय, शाळा आणि शेती या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन महावितरणने विजेचे योग्य वेळापत्रक जाहीर करावे आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
या आंदोलनादरम्यान तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. अखेर मुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी येत्या एक-दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर काँग्रेसच्या वतीने पुकारलेले हे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.





