अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरातून बेपत्ता असलेल्या वृद्ध पित्याचा त्यांच्याच मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय चाणाक्षपणे तपास करत या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील बापू आनंदा गाढवे (वय ६०) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश बापू गाढवे यानेच मिरजगाव पोलीस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तपासाचे आदेश दिले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, पोलीस अंमलदार भिमराज खर्से, पोलीस अंमलदार राहुल डोके, पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, पोलीस अंमलदार सुनिल मालणकर, पोलीस अंमलदार प्रशांत राठोड आणि पोलीस अंमलदार सतिष भवर यांच्या पथकाला तपासाबाबत आदेश दिले होते.
पथकाने बेपत्ता बापू गाढवे यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली, तेव्हा तक्रारदार मुलगा आकाश याच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या वडिलांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आणि सुनील रामदास राठोड याच्या नावाचा उल्लेख केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील राठोड याचा शोध घेतला असता, तो अकोला जिल्ह्यातील शेगाव येथे आपल्या मित्राच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता, सुनीलने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने जमिनीच्या वादातून बापू गाढवे यांचा खून केल्याची कबुली दिली.
बापू गाढवे यांची शेती विकून त्यातून पैसे मिळवायचे होते, मात्र ते जमीन विकण्यास विरोध करत होते. याच रागातून ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास सुनील राठोड, आकाश गाढवे आणि पायल ऊर्फ आकांक्षा गाढवे यांनी संगनमत करून बापू गाढवे यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्याने त्यांचा मृतदेह जाळून टाकला.
तपासादरम्यान सुनील राठोडने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. गंगाखेड, जि. परभणी) हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, शीतलने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने सुनीलने १६ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचाही खून केला आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसरात तिचा मृतदेह अर्धवट जाळून टाकला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी सुनील राठोड आणि आकाश गाढवे यांना अटक केली असून, त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत. मिरजगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अहिल्यानगर आणि अकोल्यातील दुहेरी हत्याकांड उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून जावयासह मुलगा-सुनेला अटक
धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे.





