संगमनेर, प्रतिनिधी-
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांतून रस्ता अनुदानासाठी एकूण १५७.६० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
या मोठ्या निधीतून संगमनेर शहराच्या वाट्याला ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने आता शहरातील नागरी सुविधांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासन निर्णयानुसार, या मंजूर निधीचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केले जाणार असून सर्व विकासकामे सार्वजनिक ठिकाणीच राबवण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील रहिवाशांच्या प्राथमिक गरजा आणि रस्ते विकासाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती पूर्ण ताकदीने कटिबद्ध असल्याचे यावेळी साक्षी सूर्यवंशी यांनी आवर्जून नमूद केले.





