महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून, आता हा असंतोष उघडपणे समोर आला आहे. या पराभवास जबाबदार धरत शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून पक्षाच्या शहर अध्यक्षांसह एका बड्या नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच नगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक निवडून न आल्याने ही नामुष्की ओढवल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
या गंभीर पत्रव्यवहारात भाजपचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक श्रीराम गणपुले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका पीए मार्फत गणपुले यांनी पक्ष संघटनेला विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतल्याचा आणि पक्षात ‘मी म्हणजे पक्ष’ अशी हुकूमशाही प्रवृत्ती अवलंबल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पक्ष घटनेनुसार ए.बी. फॉर्म शहर अध्यक्षांच्या ताब्यात असणे अपेक्षित असताना, गणपुले यांनी परस्पर हे फॉर्म स्वतःच्या ताब्यात ठेवून आपल्या जवळच्या व्यक्तींना वाटप केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
तसेच, भाजपकडून तिकीट दिलेल्या अनेक उमेदवारांचा पक्षाशी कोणताही संबंध नव्हता किंवा ते प्राथमिक सदस्यही नव्हते, अशा अकार्यक्षम उमेदवारांमुळेच पक्षाचा दारुण पराभव झाल्याचे पत्रात नमूद आहे. पालकमंत्र्यांसमोर सादर केलेल्या उमेदवारांच्या यादीत परस्पर फेरफार करून अपात्र व्यक्तींना ए.बी. फॉर्म दिल्याचे गंभीर आरोपही पत्राद्वारे करण्यात आले आहेत.
या पत्रामध्ये शहर अध्यक्ष पायल ताजणे यांच्यावरही टीकेची झोड उठवण्यात आली आहे. ताजणे या आपल्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या असून, त्यांनी केवळ स्वतःच्या उमेदवारीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे संपूर्ण शहरात पक्षप्रचार यंत्रणा कोलमडली होती, असा आरोप करण्यात आला आहे.
निवडणुकीनंतरही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्याऐवजी किंवा पराभवाची समीक्षा करण्याऐवजी त्या मूक आहेत, असे पत्रात म्हटले आहे. या सर्व परिस्थितीमुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली असून, अशा अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना तत्काळ पदावरून दूर करावे आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर हकालपट्टीची कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी संगमनेरमधील पन्नासहून अधिक पदाधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. या पत्रामुळे स्थानिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संगमनेर भाजपमध्ये अंतर्गत वाद पेटला; पराभवाचे खापर फोडत शहर अध्यक्षासह माजी नगरसेवकास हटविण्याची थेट प्रदेशाध्यक्षांकडे केली मागणी
संगमनेरमधील पन्नासहून अधिक पदाधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. या पत्रामुळे स्थानिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






