मुंबई, विशेष प्रतिनिधी
राज्यात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून या रॅकेटमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुराव्यांसह मांडलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सीबीआयने ८ ऑगस्ट आणि ११ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हे दाखल केले असून नाशिक तसेच इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्यांना अटक केली होती. मात्र, इगतपुरीत सुरू असलेल्या या मोठ्या रॅकेटचा सुगावा स्थानिक पोलिसांना का लागला नाही, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व अधिकारी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कार्यरत असताना तिथेही अशाच प्रकारचे बोगस कॉल सेंटर सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी संदीप सिंह आणि विशाल यादव या आरोपींवर केवळ जुजबी कारवाई करून त्यांना सोडून दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांची बदली नाशिक परिक्षेत्रात झाल्यानंतर त्यांनी पुन्हा याच आरोपींच्या मदतीने रॅकेट सुरू केल्याचे समोर आले आहे. सीबीआयच्या एफआयआरनुसार, हे रॅकेट सुरळीत चालवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोख रक्कम, सोने आणि चक्क क्रिप्टो करन्सीच्या स्वरूपात लाच दिली जात होती.
सपकाळ यांनी पुढे असेही नमूद केले की, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात झालेला आर्थिक व्यवहार आणि या कॉल सेंटरमधील काळा पैसा यांचा काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व व्यवहारांची माहिती राज्य सरकारला असूनही अद्याप दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. गृहमंत्री नेहमीप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांना क्लिन चिट देणार की ठोस कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑनलाइन फसवणूक प्रकरणात नाशिकचे आयपीएस दत्ता कराळे, अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे, बाळासाहेब पाटील यांचा सहभाग; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप
मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.






