महाराष्ट्र संवाद न्यूज, नेवासा:
राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असून, शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे मराठी शिक्षणाचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
नेवासा तालुक्यातील विविध शाळांना दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विदारक स्थितीवर बोट ठेवत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यात डॉ. तांबे यांनी अनेक शाळांमधील शिक्षक आणि संस्थाचालकांशी संवाद साधला. शिक्षक भरती प्रक्रिया प्रदीर्घ काळापासून रखडलेली असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिक्षकांचे मुख्य कार्य अध्यापन करणे असताना, त्यांना वारंवार ऑनलाईन माहिती भरण्यासारख्या अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढताना डॉ. तांबे म्हणाले की, विभागातील काही अधिकारी किरकोळ कारणांवरून शिक्षकांना धाक दाखवून त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे. याशिवाय अनेक शाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरतीही बंद करण्यात आली आहे.
शाळांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने भौतिक सुविधांचा अभाव निर्माण होत आहे. शासनाने या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मराठी शाळांची अवस्था अधिक बिकट होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.






