अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
महाराष्ट्र संवाद न्यूज, अहिल्यानगर:
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहासाठी मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयोमर्यादेचे उल्लंघन करून विवाह लावून दिल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये केवळ मुला-मुलीचे पालकच नव्हे, तर लग्नाचे आयोजक, नातेवाईक आणि या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यासाठी दंडासह कारावासाची देखील तरतूद करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मोहिमेसाठी गावपातळीपासून ते शहरापर्यंत जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम पाहणार असून त्यांना अंगणवाडी सेविका साहाय्यक म्हणून मदत करतील. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मुख्य सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अधिकारी स्थानिक पातळीवर होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतील.
विशेषतः मंगल कार्यालये, मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारे यांसारख्या प्रार्थनास्थळांच्या प्रमुखांना प्रशासनाने आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही बालविवाहास सहकार्य करू नये. तसेच बँडपथके, डीजे चालक, केटरर्स, फोटोग्राफर आणि विवाह विधी करणाऱ्या धर्मगुरूंनी वयाची खात्री केल्याशिवाय सेवा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नमूद केले आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी किंवा वर्षभरात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने ‘चाइल्ड हेल्पलाईन १०९८’ किंवा ‘पोलीस हेल्पलाईन ११२’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या
१८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण थांबते आणि आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. समाज म्हणून आपण सर्वांनी मिळून संगमनेर तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
— जयश्री जाधव (संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग)






