महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल १२ वर्षे चाललेल्या एका महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) या खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल भैय्याजी बागडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. आरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. सुजाता गोडसे यांनी सहकार्य केले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी २०१४ सालातील आहे. पीडित मुलगी १७ वर्षे ६ महिने वयाची असताना, आरोपी राहुल बागडे याने तिला लग्नाचे आणि सुखी आयुष्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता. या काळात पीडिता गर्भवती राहिली आणि ऑगस्ट २०१५ मध्ये ती पुन्हा आपल्या पालकांकडे परतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले होते. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (२)(एन), ३६३, ३६६(अ), ३४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे पीडित मुलगी, तिचे वडील, आई आणि वैद्यकीय अधिकारी अशा एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. पीडित मुलीने न्यायालयात साक्ष देताना आपण आरोपीला ओळखत नसल्याचे सांगितले आणि तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, तिने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६४ अंतर्गत दिलेला जबाबही नाकारला. पीडितेच्या पालकांनीही आपल्या साक्षीमध्ये आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा दिला नाही, उलट त्यांनी आरोपीने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप फेटाळून लावला.
न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, केवळ पीडित आणि तिच्या पालकांनी दिलेली नकारात्मक साक्षच नव्हे, तर सादर करण्यात आलेला डीएनए अहवालही आरोपींना दोषी ठरवण्यासाठी अपुरा ठरला आहे. रक्ताचे नमुने कोणाच्या उपस्थितीत घेतले आणि ते पीडित व आरोपींचेच होते का, याबाबत ठोस पुरावा नसल्यामुळे डीएनए चाचणीचा निष्कर्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुख्य आरोपी राहुल बागडे, इंदिरा बागडे, वनिता बागडे, नरेंद्र गजभिये, प्रगती गजभिये आणि नीता पानतावणे (सर्व रा. नागपूर) या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
तर आरोपी भैय्याजी बागडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावरील खटला आधीच बंद करण्यात आला होता. तर मुख्य आरोपी राहुल बागडे हा तुरुंगात होता. न्यायालयाने या निकालासोबतच आरोपींचे जामीन रोखे रद्द करण्याचे आणि मुदतीनंतर या प्रकरणातील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.






