महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकास कामांत अग्रस्थानी असलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला पूर्णपणे डावलण्यात आले असून, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या पदरी ‘शून्य’ टक्के पीक विमा पडला आहे. हा प्रकार म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी खेळलेला एक राजकीय डाव असल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे.
या संदर्भात आनंद वर्पे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि विस्तारित आहे. पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विविध विभागांत विभागलेल्या या तालुक्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आजवर कायमच पीक विमा आणि इतर शासकीय मदतीचे कवच लाभले. मात्र, गेल्या दीड वर्षात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे संगमनेरच्या विकासकामांना खीळ बसली असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या मदतीतही जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पीक विम्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास संगमनेरवर झालेला अन्याय स्पष्टपणे अधोरेखित होतो. जिल्ह्यात एकूण ११८ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून, त्यामध्ये शेजारील राहता तालुक्याला १३ कोटी, कोपरगावला ९ कोटी, एकट्या श्रीरामपूरला १७ कोटी, राहुरीला ६ कोटी आणि अकोले तालुक्याला १ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, संगमनेर तालुक्याच्या वाट्याला एक रुपयाही न आल्याने सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
सध्याचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री केवळ जाहिरातबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विकासाचा आभास निर्माण करत असून, प्रत्यक्षात मात्र जमिनीवर कोणतेही ठोस काम दिसत नाही, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून केवळ प्रसिद्धीसाठी काकडवाडी सारख्या ठिकाणी टँकर पाठवून लगेच बंद करण्यात आले. याउलट, राजहंस दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत पठार भागातील तहानलेल्या वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवून शेतकऱ्यांना आधार दिला आहे. धार्मिकता आणि जातीभेदाच्या नावाखाली राजकारण करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याने सामान्य जनता होरपळून निघत आहे.
याच विषयावर बोलताना ज्येष्ठ शेतकरी पांडुरंग गुंजाळ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली केवळ ‘टक्केवारी’चे राजकारण सुरू असून, टक्केवारी वाढली असली तरी सामान्य शेतकऱ्याची मात्र मोठी वाट लावली गेल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या क्रूर थट्टेविरोधात आता संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकरी एकवटले असून, आगामी काळात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.






