महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचा वारसा जपणाया महाराष्ट्रात सध्या वैचारिक संघर्षाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वारकरी संप्रदायावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांविरोधात ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार समर्थन केले आहे. विकास लवांडे सारख्या प्रवृत्तींना योग्य धडा शिकवण्याचे काम भंडारे महाराजांनी केले असून, ही कृती लाखो वारकरी भाविकांच्या भावनांचेच प्रतिबिंब असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.
आमदार अमोल खताळ यांनी आपल्या समाज माध्यमावरील अकाउंट मध्ये म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय हा केवळ एक मार्ग नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संतपरंपरेचा आणि हिंदू अस्मितेचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. गेल्या काही काळापासून ठराविक प्रवृत्तींकडून वारकरी संप्रदाय, संत आणि गुरुतुल्य व्यक्तींबद्दल सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत.
https://www.facebook.com/share/p/17jcG8qCPj/
अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायाशी वाकड… त्याची नदीवर लाकड! हे शब्द सर्वसामान्य जनतेच्या मनातील संताप व्यक्त करणारे शब्द आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. देव, देश, धर्म आणि गौरवशाली संतपरंपरेचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही खताळ यांनी यावेळी दिला.
हिंदू धर्म, भगवी पताका आणि वारकरी परंपरेवर द्वेषपूर्ण भाषा वापरणाऱ्यांना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने ठोस उत्तर दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी घेतलेली ही स्वाभिमानी भूमिका धर्माभिमान जागृत करणारी असल्याचे सांगत, खताळ यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांना पूर्णतः जाहीर समर्थन जाहीर केले आहे. या भूमिकेमुळे आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






