लोक विचारतात, तुला याच्यात नेमकं काय दिसतं? ठीक आहे, तर आज सांगतो, मला राहुलमध्ये काय दिसतं. हिंदुस्थानच्या इतिहासात ५००० वर्षात सर्वात जास्त खालच्या पातळीची टीका जर कुणावर झाली असेल तर तो राहुल गांधी आहे. एवढी टीका सहन करूनही तो जनसामान्यांच्या प्रश्नांपासून तसुभरही ढळलेला नाही. कित्येक वर्ष देशाच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या घराण्याचा तो वारसदार आहे. आणि तरीही तो ना हिटलर आहे, ना चंगेज खान, ना ईदी अमीन. त्याने कधी कोणते अमानवीय किंवा अक्षम्य कृत्य केलेले नाही.
त्याची एकच चूक, तो एका विशिष्ट घराण्यात जन्माला आला. त्याला हटवण्यासाठी, हादरवण्यासाठी, खाली खेचण्यासाठी अनेक वर्षांपासून एक व्यवस्थित निधीपुरवठा केलेली, समन्वयित आणि संघटित मोहीम सुरू आहे. पण त्याची आतली ताकद बघा हा माणूस ढळतच नाही. जगात असा कोण आहे, ज्याच्या वडिलांपासून आई, बहीण, आजोबा, आजी, पणजोबा, खापरपणजोबांपर्यंत जाऊन शिव्या दिल्या गेल्या? पूर्वजांबद्दल गलिच्छ कथा तयार केल्या गेल्या? आणि सहाव्या पिढीतील मुलाकडून त्याची उत्तरं मागितली गेली? मानवी इतिहासात अभूतपूर्व!
पण हा माणूस तरीही हसत राहतो. पलटून द्वेषाने उत्तर देत नाही. कोणासाठीही तोंडातून अपशब्द काढत नाही. सूड घेत नाही. तो “मोहब्बत की दुकान”ची भाषा करतो. शिव्या देणाऱ्यांनाही मिठी मारतो. फसवणूक करणाऱ्यांनाही शुभेच्छा देतो. अशा माणसाचा कोणी द्वेष कसा करू शकतो? मी तर नाही. पण कारणं अजूनही आहेत.
तुम्ही आणीबाणी का आठवता? का? कारण राहुल लोकशाहीवादी आहे. स्वतःच्या इच्छेपेक्षा इतरांची इच्छा मान्य करतो. मित्रांचं ऐकतो. समोरच्याच्या हुकूमशाहीचं समर्थन करताना तुम्ही हे म्हणू शकत नाही की, अरे, तू स्वतःही हुकूमशहा आहेस. मग काय करायचं? तर त्याला त्याच्या आजीची आणीबाणी आठवण करून द्यायची. तू नसशील, पण तुझी आजी तर हुकूमशहा होती. नेहरूंचे महिलांसोबतचे फोटो दाखवले जातात, का? कारण स्वतः हेरगिरी करणाऱ्या, स्त्रियांकडे गलिच्छ नजरेने पाहणाऱ्या नेत्याच्या समर्थनात तुम्ही हे म्हणू शकत नाही, राहुल, तूही चारित्र्यहीन आहेस.
त्याच्या दोन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत चारित्र्यहीनतेचा लेशमात्र आरोपही नाही. मग म्हणायचं… तू नाही, पण तुझा पणजोबा तसा होता. आणि मग बनावट फोटो दाखवायचे. १९४७ पासून बोफोर्सपर्यंतच्या घोटाळ्यांची यादी दाखवली जाते. का? कारण २००४ पासून केंद्र आणि अनेक राज्य सरकारांमध्ये एका फोनवर मोठमोठी कामं करून घेण्याची ताकद राहुलकडे होती आणि खरं सांगायचं तर २०१४ नंतरही आहे.
पण ठेके, कमिशन, भ्रष्टाचार, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती यापैकी कशाचाही आरोप राहुलवर नाही. मग तुम्ही १९५७ किंवा १९८७ चे आरोप पुन्हा उकरून काढता तू नाही, तुझा बाप भ्रष्ट होता. वेगळी गोष्ट म्हणजे ते आरोपही हवेतच विरले. तुम्ही १९८४ चे दंगे का आठवता? कारण UPA पासून आतापर्यंत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचलसारखी सरकारं दंगामुक्त राहिली. दंगेखोर मानसिकतेचे लोक राहुलच्या सरकारांना दंगेखोर म्हणू शकत नाहीत. मग काय? जा, तुझा बाप दंगेखोर होता. जे दोष राहुलमध्ये नाहीत, ते त्याच्या पूर्वजांमध्ये शोधले जातात. आणि इतके दोष पूर्वजांवर टाकले गेले आहेत की कदाचित काही उरलेच नसेल.
मागे वळून पाहिलं तर मानवी किंवा राजकीय स्वरूपाचा असा एकही अवगुण नाही, जो राहुलमध्ये सापडेल. खरंतर वारंवार नेहरू, इंदिरा, राजीव, औरंगजेब, गझनी, घोरी, पृथ्वीराज चौहान यांची नावं घेण्याचा अर्थ हाच की राहुलमध्ये त्याचे विरोधकही काही दोष शोधू शकत नाहीत. आणि हे ते लोक आहेत, जे १२ वर्षांपासून राहुलच्या आजूबाजूला आयबी, रॉ आणि स्वतःच्या पक्षातील लोक घुसवून सतत नजर ठेवून आहेत. पेगॅसससारख्या साधनांनी त्याच्या फोनमध्येही डोकावत आहेत. पण १२ वर्षांनंतरही जर त्यांना त्याच्यात चारित्र्यदोष, भ्रष्टाचार, पैशांचे व्यवहार किंवा कोणताही कमकुवत मुद्दा सापडत नसेल तर मान्य करावंच लागेल की अशा तोडीचा माणूस, २०२४ मध्ये भारतीय राजकारणात एकाधिकारशाही उदयास येऊ पाहात असताना सत्ताधारी पक्षांचे ४०० चे स्वप्न २४० वर आणून ठेवणारा खरा जननायक म्हणजे राहुल गांधी.







