महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या कायापालटासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीमधील विविध कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असून, या प्रस्तावाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचे औचित साधित त्यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदार खताळ यांनी वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि पथदिवे यांसारख्या गंभीर समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. वसाहतीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्याने उद्योजक व कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, यासंदर्भात उद्योग केंद्र, अहिल्यानगर यांनी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव यापूर्वीच तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला असून, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यासाठी आमदार खताळ सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाहीच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. या विकासकामांना मंजुरी मिळाल्यास संगमनेर औद्योगिक वसाहत हे रोजगार निर्मितीचे एक आधुनिक आणि सुसज्ज केंद्र बनेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.






