महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
कत्तलीसाठी गोवंश निर्दयतेने अन्न पाण्यावाचून बांधून ठेवणाऱ्याविरोधात संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर भागात छापा टाकून पोलिसांनी २ लाख ६० हजार रुपये किमतीची एकूण १२ गोवंश जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना गुरुवारी (दि. १४ मे) सायंकाळच्या सुमारास एका गोपनीय बातमीदाराकडून गोवंश कत्तलीसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर गल्ली नंबर १ मधील हावडा ब्रिज नाल्या शेजारी असलेल्या काटवनात सय्यद राजमोहंमद सय्यद आरिफ याने महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवल्याचे समजले होते.
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी डॉ. सोनवणे यांनी तात्काळ पथकाला रवाना केले. पोलीस अंमलदार बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांनी दोन पंचासह सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काटवनात चारा-पाण्याविना अत्यंत निर्दयतेने बांधलेली जिवंत जनावरे पोलिसांना आढळून आली. घटनास्थळी चौकशी केली असता, ही जनावरे मदिनानगर येथील सय्यद राजमोहंमद सय्यद आरिफ याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
या पोलीस कारवाईत २० हजार रुपये किमतीचे १० काळ्या-पांढऱ्या रंगाचे गोवंश आणि ३० हजार रुपये किमतीची २ गोवंश जनावरे, असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ४१४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस अंमलदार बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






