महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या गंभीर आरोपावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मोठा निर्णय घेत, लोकनियुक्त सरपंच आणि उपसरपंचासह एकूण पाच सदस्यांना अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे केवळ घुलेवाडीतच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, घुलेवाडी येथील सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात शिवसेनेचे शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीकामी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
प्रशासकीय पातळीवर झालेल्या चौकशीत आणि त्यानंतर झालेल्या सुनावणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. सादर करण्यात आलेला शासकीय अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले की, लोकप्रतिनिधी असतानाही या सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते.
या पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सरपंच निर्मला कैलास राऊत, उपसरपंच दत्तात्रय चिमण राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल बबन राऊत, बाजीराव लक्ष्मण पानसरे आणि सोनाली रवींद्र गिरी या पाचही जणांना दोषी धरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे, निर्मला राऊत या गावच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच आहेत. एकाच वेळी पाच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने गावच्या प्रशासकीय कामावरही याचे परिणाम उमटण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निकालात या पाचही जणांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, या निकालामुळे घुलेवाडीतील सत्ताधारी गटात चिंतेचे वातावरण असून, हा निकाल आपल्यावर अन्याय करणारा असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. या कायदेशीर लढाईत आता नवीन वळण येण्याची शक्यता आहे, कारण अपात्र ठरवलेले सरपंच, उपसरपंच आणि तीनही सदस्य या निर्णयाविरोधात वरिष्ठ स्तरावर अपील करणार असल्याचे समजते.






