तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याही पावसाचा जोर कायम असल्याने, या घरांच्या उर्वरित भिंतीही कधीही कोसळतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची गांभीर्य ओळखून संबंधित नागरिकांनी तातडीने गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना माहिती दिली. पोलीस पाटील नेहे यांनी तत्परता दाखवत या नुकसानीबाबत महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणजेच संगमनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांना अवगत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गावचे ग्राम महसूल अधिकारी महेश वाडेकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि झालेल्या नुकसानीचे रीतसर पंचनामे पूर्ण केले आहेत.
दुसरीकडे, या जोरदार भीज पाऊसामुळे परिसरातील विहिरी आता तुडुंब भरल्या असून, जमिनी मोठ्या प्रमाणावर पाणी उपळायला सुरुवात झाली आहे. सततचे ढगाळ आणि पावसाळी वातावरण, तसेच शेतात साचलेले अति पाणी व बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उभ्या शेती पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने घरांच्या नुकसानीसोबतच शेती पिकांच्या नुकसानीचेही तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.