संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे ४ हजार ५९१ शेतकऱ्यांना फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार ३ हजार १७७.४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे.
तालुक्यात रविवारी (२९ मार्च) आणि सोमवारी (३० मार्च) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणच्या घरांचे आणि गोठ्यांचे पत्रे उडून गेले. शेतात काढणीला आलेला गहू, कांदा, मका यासह भाजीपाला आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, मंगळापूर, निमज, पेमगिरी, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, वडगाव लांडगा, राजापूर, चिखली, चिकणी आणि सायखिंडी या गावांना या पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.
नुकसानीच्या आकडेवारीनुसार, रविवारी झालेल्या पावसामुळे १००६.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात २ हजार ४८५ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यानंतर सोमवारी पुन्हा झालेल्या पावसाने अधिक हानी केली असून, २ हजार १७०.९६ हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. यात २ हजार १०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे दोन दिवसांच्या पावसाने एकूण ३ हजार १७७.४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील पठार भागात गारपिटीने नुकसान केले होते आणि आता पुन्हा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून हा प्राथमिक अहवाल लवकरच महसूल विभागाला सादर केला जाणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात बोलताना तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी स्पष्ट केले की, बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे.
अवकाळीचा तडाखा: संगमनेर तालुक्यात ३१७७ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४५९१ शेतकऱ्यांना फटका
या संदर्भात बोलताना तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी स्पष्ट केले की, बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे






