Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – 

गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सायखिंडी येथील श्री मनोहरबाबा विद्यालयात आयोजित ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’तून विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयातील रंजकता अनुभवली. मंगळवारी पार पडलेल्या या सत्रात प्रसिद्ध व्याख्याते डॉ. निवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर भर न देता तर्कशुद्ध आणि चिकित्सक विचारसरणी स्वीकारण्याचे आवाहन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमधील गणित-विज्ञानाची भीती दूर होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

नाशिक येथील निवृत्त प्राध्यापक तथा राज्य पुरस्कार विजेते डॉ. निवास पाटील यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे आणि प्रयोगांच्या माध्यमातून कठीण मानले जाणारे विषय अत्यंत सोप्या भाषेत मांडले. कोणत्याही संकल्पनेचा अभ्यास करताना ‘का?’ आणि ‘कसे?’ असा शोध घेण्याची वृत्ती जोपासल्यास विज्ञानाची गोडी सहज निर्माण होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतरत्न राजीव गांधी विद्यालय, निमजचे माजी मुख्याध्यापक शांताराम डोंगरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ऋषिपंचमी तसेच अभियंता दिनाचे औचित्य साधून भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्त्व पटवून दिले. शिक्षकाची भूमिका केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित नसून तो विद्यार्थ्याच्या आत्म्याचे परिवर्तन घडवणारा मार्गदर्शक असतो, हा विचारही या वेळी अधोरेखित करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, सामाजिक जाणीव आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू असल्याचे विद्यालयाने स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता डांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केले. या उपक्रमाच्या यशासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply