महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सत्य, अहिंसा आणि त्यागाची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने केवळ भारतच नव्हे तर जग चालत असल्याने गांधीजी आंतरराष्ट्रीय शांतीदूत ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयामध्ये कॉग्रेस कमिटीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, प्रमिला अभंग, बाळासाहेब पवार, सुनील कडलग, रमेश नेहे आदी उपस्थित होते. यावेळी गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
आमदार तांबे म्हणाले, जगाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी यांचे मोठे स्थान आहे. त्यांच्यासह अनेक स्वातंत्रसैनिक, राष्ट्रपुरुषांनी केलेल्या त्यागातुन देशाला स्वातंत्र मिळाले. आपल्या देशाच्या लोकशाही महत्वाची ठरली असून शांतता व एकोपा नांदण्यासाठी गांधीनी दिलेले तत्व जगाला दिशादर्शक ठरले आहे. स्वातंत्र लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे माजी पंतप्रधान शास्त्रींनी १९६५ च्या भारत-पाक युध्दामध्ये देशाला विजय मिळवून दिला. या दोन्ही विभुतींचे जीवनकार्य भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधीमूळे देशाची ओळख निर्माण झाली. त्यांचे कार्य व विचार तरुण पिढीसाठी अनुकरणीय ठरणारे आहेत.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, महात्मा गांधी यांचे जीवन कार्य हे संघर्षातून उभे राहिल्याचे आपल्याला दिसते. स्वातंत्र लढ्यात सर्वसामान्य गोरगरीबांना सामावून घेतांना त्यांनी संपूर्ण देश जागा केला. त्यांच्या आंदोलनाने ब्रिटीशांनादेखील धडकी भरत असे. ब्रिटीशांच्या अत्याचाराला त्यांनी अहिंसेतून उत्तर दिले. सत्य व अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधीचे तत्वज्ञान आजही आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय आहे. नवीन पिढीने गांधीच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे.

