महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत श्रम केल्यानेच ही कामे आज मार्गी लागली आहेत. ती आता कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो, मात्र या कामात तुमचे योगदान काय, समन्यायी पाणी वाटपावर होतात आम्ही संघर्ष करत असताना तुम्ही गप्प का होतात, असा थेट सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्र्यांना नाव न घेता केला आहे.
तालुक्यातील तळेगाव दिघे येथे विविध विकास कामांची उद्घाटने माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, जि. प. सदस्य महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, बेबी थोरात, अमित पंडित, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि विश्वासामुळे राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग प्रामाणिकपणे जनतेची कामे करण्यासाठी केला. 1999 ला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. अनेक अडचणी आल्या परंतु यामध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मोलाचे सहकार्य केले. आज श्रेय घेऊ पाहणाऱ्यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही. प्रकल्प बाधितांना सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या दिल्या.
2014 ते 19 च्या काळात कामे अगदी मंदावली होती. ईश्वराच्या आशीर्वादाने पुन्हा सत्ता मिळाली आणि कालव्यांच्या कामाला खरी गती आली. हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ही कामे अंतिम टप्प्यात आहे. खरे तर या दिवाळीला पाणी या शिवारात आणायचे होते. परंतु सत्ता बदल झाला आणि कामे थंडावली. ही कामे अंतिम टप्प्यात आहे. आता आपले पाणी कोणीही अडवू शकणार नाही.
आज मी-मी म्हणणाऱ्यांची या कामात कोणतीही मदत नाही. समन्यायी पाणी वाटपाबाबत सातत्याने विष पेरण्याचे काम काही लोक करत आहेत. आंदोलनावेळी तुम्ही विधानसभेत होतात त्यामुळे त्यावर काही का बोलले नाही. आम्ही कधीही वाईट राजकारण केले नाही, कुणाच्या अन्नात माती कालवली नाही. किंवा कुणाबद्दल वाईटही चिंतले नाही. मात्र सध्या द्वेष भावनेचे राजकारण सुरू आहे. तुम्हाला पद मिळाले त्याप्रमाणे वागा. पदाची तरी किंमत ठेवा.
निळवंडे कालव्यासह मागील वर्षी कोरोना संकटातही पाणीपुरवठा योजनेसाठी 883 कोटी रुपयांचा निधी मिळवला. विविध रस्ते व विकास कामांसाठी निधी मिळवला. मात्र नवीन सरकार आले आणि सर्व कामांना स्टे दिला. हे सरकार स्थगिती सरकार आहे. परंतु लवकरच बदल होणार आहे. देशात बदलाचे वारे निर्माण झाले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या तालुक्यात काही खबरे निर्माण झाले असून या खाबऱ्यांचा आता जनता नक्की बंदोबस्त करेल.
आमदार डॉ तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हजारो कोटींची विकास कामे झाली आहे. निळवंडे धरण पूर्ण करून या कालव्यासाठी आमदार थोरात यांनी आपले पद पणाला लावले. तालुक्याचा विकास वेगाने होतो आहे. येत्या दोन-तीन महिन्यात थोरात यांच्या माध्यमातून या भागात पाणी येऊ शकते. सध्याचे सरकार भांडवलदारांसाठी असून लोकशाही व तालुक्याचा विकास टिकवण्यासाठी सर्वांनी थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे.
यावेळी महेंद्र गोडगे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, मिलिंद कानवडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी, सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी, तर रमेश दिघे यांनी आभार मानले.

