महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क :
नासिकच्या औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका परिसरात मिरची चौकामध्ये शनिवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.
अपघातग्रस्त बस यवतमाळहुन मुंबईकडे चालली होती. मात्र शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही बस नांदूर नाक्याजवळ मिरची चौकात आल्यानंतर चौफुलीवर एका टँकरला धडकली आणि अपघातानंतर लगेचच चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन-चार वाहने तसेच चार-पाच रुग्णवाहिका झाल्या होत्या. पेटलेली अपघातग्रस्त बस विजविण्याचा अर्धा तासाहून अधिक वेळ प्रयत्न सुरू होता. आग एवढी भीषण होती की काही वेळातच बस पूर्णतः जळून खाक झाली. पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरू असल्याचे सांगितले जाते.
ट्रॅव्हल्स बस पेटल्यानंतर ज्यांना शक्य झाले ते प्रवासी तातडीने खाली उतरले तर अनेकांनी उड्या मारल्या आगेची तीव्रता एवढी भीषण होते की यात दहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे हलविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली. होळपळून मृत्यू झालेल्यात सर्व पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळते.

