महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
चार बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात अखेर घारगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.
तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हौशीराम बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज वितरण कंपनीच्या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायरमन भालेराव (पूर्ण नाव माहित नाही), जालिंदर लेंडे (पूर्ण नाव माहित नाही) आणि साहेबराव शिवाजी लेंडे (दोघे रा. खंदरमाळ, ता. संगमनेर अशी आरोपींची नावे आहे. आरोपी पैकी विजय सयाजी भालेराव याला अटक करण्यात आली आहे.
शनिवारी वांदरकडा खंदरमाळवाडी येथे असलेल्या एका छोट्याशा तलावात पाण्यात पडलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने आंघोळीसाठी गेलेल्या अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्ष), ओंकार अरुण बर्डे (वय १० वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) व विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष) या चार भावंडांचा शनिवारी मृत्यू झाला. हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत या बालकांचा अंत्यविधी न करण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. रविवारी सकाळी सांत्वनासाठी आलेल्या पालकमंत्री विखे पाटील यांनी यासंदर्भात मध्यस्थी करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानंतर संबंधित बालकांचा अंत्यविधी झाल्यानंतर अरुण हौशीराम बर्डे यांनी या संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी म्हटले की, घटनास्थळी वीज वितरण कंपनीच्या पोल वरील विजेची तार तुटलेली असल्याने फिर्यादीने वीज रोहित्राचा खटका बंद करून वीज पुरवठा बंद केला होता. आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. माहिती मिळाल्यानंतर दुरुस्ती करण्याचे काम वायरमनचे होते मात्र त्यांनी दुरुस्ती केली नाही. तसेच अन्य दोन आरोपींना वीज प्रवाह चालू केल्यास तुटलेल्या तारेमुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असताना देखील त्यांनी वीज रोहित्राचा खटका सुरू केला होता त्यामुळे तुटलेल्या तारेतून वीज प्रवाह पाण्यात गेल्याने चारही बालकांचा मृत्यू झाला. या आशयाच्या तक्रारीवरून संबंधिताविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यासंदर्भात स्वतः पुढील तपास करत आहे.

