महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
निवडणूक चिन्ह गोठविण्यापर्यंत ठीक आहे मात्र पक्षच वापरायला बंदी घालण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अभूतपूर्व म्हटला पाहिजे. देशाच्या इतिहासात असा निर्णय कधीच झाला नाही. शिवसेना संपविण्यासाठी भाजपने कशी पाऊले टाकली हे सर्वांना दिसत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
शिवसेनेवरून ठाकरे शिंदे गटातील वाद दावे प्रति दावे राज्यासह संपूर्ण देश बघत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून फक्त शिवसेना हे नाव देखील वापरण्यास दोन्ही गटांना मज्जाव केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह आयोगाला देण्यात आले आहे. याबाबत आयोगाचा निर्णय प्रतीक्षेत आहे.
पाथर्डीमध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पार्श्वभूमीवर माध्यमांशी भगवानगडावर बोलताना भाष्य केले. पाटील म्हणाले, भाजपने शिवसेना संपवण्यासाठी कशी पावले टाकली ते सर्वांना दिसत आहे. एखाद्याच्या हातातून पक्ष हिसकावून घेणे, कितपत योग्य आहे. चिन्ह गोठवणे इथपर्यंत समजू शकतो, परंतु पक्ष वापरायला बंदी घालणे असा निर्णय इतिहासात कधीच झाला नाही.
श्री क्षेत्र भगवानगडावर प्रदेशाध्यक्ष पाटील व आमदार धनंजय मुंडे यांनी संत भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याबरोबर विकासकामाची पाहणी
करून चर्चा केली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
आमदार मुंडे म्हणाले, पक्षावर बंदी आणण्याची घटना यापूर्वी इतिहासात कधीच घडली नाही हे सर्व कोणी केले हे घरातील एखाद लहान मूल देखील सांगू शकेल.

