महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आपल्यावरील टीकेला टीकेने उत्तर देण्याची गरज नसून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेताना शंभर दिवसातील आपले निर्णय जनतेसमोर न्या, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याने ते आता कोणत्याच गटाला मिळणार नाही. यावरून सध्या ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटाला आता नवे नाव आणि चिन्ह शोधावे लागणार आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या गटाच्या शिवसेनेचे नवे नाव आणि चिन्ह काय असावे यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याच गटातील मंत्री, आमदारांचे चांगलेच कान टोचले असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नेत्यांना तंबी दिली आहे. “कोणीही कायदा हातात घेऊ नये, सरकारला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या”, असे त्यांनी बजावले आहे. टीकेला टिकेने उत्तर देण्याची गरज नसल्याचा सल्ला ही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिला आहे. तसेच सरकारने १०० दिवसात केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

