महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून ‘ईडी’ सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती, त्या बहुचर्चित बदल्या अखेरीस करण्यात आले आहे. आपल्या पोलीस दलातील पहिल्याच नियुक्तीत श्रीरामपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या राकेश ओला यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
शिंदे फडणवीस सरकारने प्रथमत:च आयपीएस अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. ऐन दीपावलीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर गृह विभागाने काढले आहेत. यातील 24 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे.
तर अन्य अधिकाऱ्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अहमदनगरचे सध्याचे एसपी मनोज पाटील यांचाही समावेश असून त्यांच्या बदलीसंदर्भात पून्हा नव्याने आदेश काढले जाणार आहेत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा नगरमधील कालावधी पुर्ण होण्याच्या एक वर्ष अगोदरच त्यांना येथून हटविण्यात आले आहे. महिनाभरात घडलेल्या पोलीस दलातील काही घटनांमुळे पाटील चांगलेच चर्चेत आले होते. आपल्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखू न शकल्याने ते वादग्रस्त ठरण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच त्यांची बदली करण्यात आली आहे. ओला त्यांच्या जागी पदभार घेतील. ओला सध्या नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्तीस होते.
२०१२ च्या आयपीएस बॅचचे अधीकारी असलेले ओला सरळ सेव भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांना सर्वप्रथम श्रीरामपूरला नियुक्ती मिळाली होती.
येथील कालावधीत त्यांनी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीचा छडा लावला होता. त्यांचा येथील कार्यकाल गाजला होता.

