प्रशांत गुंजाळ
(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून संगमनेर न्यायालयात वकील आहेत)
सन 2014 च्या मे महिन्यामध्ये मी एका पक्षकाराचे घटस्फोटाचे प्रकरण संगमनेरच्या न्यायालयात दाखल करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तत्कालिन न्यायाधीशांनी माझ्या असं निदर्शनास आणून दिले की, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास शंभर घटस्फोटाची प्रकरणे न्यायालयात निवाड्यासाठी दाखल झाली आहेत. माननीय न्यायाधीश साहेबांनी त्यावर चिंता व्यक्त करत एक भिती बोलून दाखविली होती. दुर्दैवाने आता ती भिती आता खरी होताना दिसत आहे.
गत दोन दशकांच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी समाजातील एकत्र कुटूंब पध्दती लयाला गेली. याच काळात एकत्र कुटूंब पध्दती जावून विभक्त कुटूंब पध्दती समाजात निर्माण झाली. याचे धोके आता समोर येऊ लागले आहेत. ही पध्दती या समस्त नवीन पिढीने जन्माला घातली. सुमारे चार दशकापर्यंत विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात नव्हती. त्यावेळी एकत्र कुटुंब ही संकल्पना रुजविण्यात तत्कालीन पिढीला यश आले. किंबहुना ती निरंतर चालत आलेली प्रक्रिया होती.
त्यावेळी एकत्र कुटुंबात प्रगती होते असे नेहमीच बोलले जायचे. एखादे कुटुंब विभक्त झाल्यास त्याची चर्चादेखील संपूर्ण गावात होत होती. त्या व्यक्तीला अथवा कुटुंबाला सामाजिक भान नाही असे समजले जात होते. कुटुंबातील एखाद्या व्यक्ती शिकून नोकरी धंद्याला लागली की त्याला त्यामध्ये कशी मदत करता येईल यातच सर्व कुटुंबाचा विचारा असायचा मग त्याची घर खरेदी असू देत किंवा अजून काही मात्र त्यामुळे कधीही कुटुंबात आकस निर्माण होत नव्हता. कोणतेही नवीन घडामोड झाल्यास किंवा कुटुंबात काही खरेदी केल्यास सर्व कुटुंबीय त्याचा आनंद घेत असत. उलट त्यावेळी मुलांकडे आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबा चुलते-काके अधिक लक्ष देत होते.
या एकत्रीत कुटूंब पध्दतीत त्यांचे शिक्षण, लग्न आदी बाबींकडे कुटूंबातील सर्वच सदस्य एक जबाबदारी म्हणून बघत असत. मात्र साधारणतः 90 च्या दशकानंतर काळ बदलत गेला, आणि समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. या कुटूंब पध्दतीचे फायद्याऐवजी तोटेच जास्त दिसू लागले असून ही पध्दती आता खूप विकोपाला गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु या नवीन कुटुंब पद्धतीचा परिणाम हा समाजाचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्यास कारणीभूत ठरला. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी समाजामध्ये येत आहे. किंबहुना आता तो खूप वाढला आहे.
केवळ पती-पत्नी हा परिवार होवू शकत नाही तर आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशा सर्वांचा मिळून परिवार बनत असतो. याशिवाय एकत्र कुटूंब घटकात आणखी नातेवाईकदेखील असतात. या एकत्र कुटूंब पध्दतीत मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार होत असत. अशा प्रकारचे परिवाररुपी कुटूंब आज संपुष्ठात आले आहे. एकत्र कुटूंब पध्दती म्हणजे नैसर्गीक मानसोपचाराचे एक चालते बोलते समुपदेशन केंद्रच. कोणत्याही आनंदात एकत्रीत सामील होत आणि दुख:द प्रसंगात एकमेकांना सांभाळून घेत परिस्थितीवर मात करण्याची ताकद एकत्र कुटूंब पध्दतीत विश्वास निर्माण करीत. कितीही तीव्र मतभेद एकत्र कूटंब पध्दतीत घरातच मिटविले जात. या मतभेदासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची फारशी वेळ येत नसे. आता मात्र विविध कारणांनी विभक्त कुटूंब पध्दती अस्तीत्वात आली, यामुळे अनेक नव्या समस्यादेखील समाजात निर्माण झाल्या आहेत.
याचा प्रत्यय मला सन 2014 च्या मे महिन्यामध्ये आला होता. ज्यावेळी मी एक घटस्फोटाचे प्रकरण संगमनेर येथील न्यायालयात दाखल करण्याकिरता गेलो असता तत्कालीन न्यायाधीशांनी माझ्या असं निदर्शनास आणून दिले की, 1 जानेवारी ते 30 एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सुमारे शंभर घटस्फोटाची प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यावर त्यांनी चिंता व्यक्त करत एक प्रकारची भीती व्यक्त केली होती. ती भीती आता खरी होताना दिसत आहे. मोठ्या महानगरात होणारे घटस्फोटाचे प्रमाण व आपल्याकडील तालुक्यासारख्या ठिकाणी होणारे घटस्फोटाचे प्रमाण, कौटुंबिक कलहाचे प्रकरणे इतकी वाढले आहेत की त्यांची संख्या नमूद करणे अवघड आहे.
मोठ्या शहरात आज कौटुंबिक न्यायालये सुरु आहेत. कौटुंबिक निवाडे लवकर व्हावेत, हा यामागील हेतू असला तरी विभक्त कुटूंबात समजूतदारपणाचा अभाव, कुटूंबापेक्षा करिअरला जास्तीचे प्राधान्य, एकमेकांत सुरु असलेली रस्सीखेच, स्पर्धा, संभाषणाचा अभाव आणि एकमेकांना वेळ न देणे अशा अनेक कारणांमुळे आज कुटूंब विभक्त होतांना दिसतात. नात्यात दुरावा निर्माण करण्यास मोबाईलदेखील कारणीभूत ठरु लागल्याने अनेक कुटूंबात यावरुनदेखील वाद निर्माण होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहे. या व अशा अनेक कारणांमुळे आज कौटुंबिक कलहाच्या प्रमाणात मोठी वाढ होतांना दिसते. विभक्त कुटूंब पध्दतीत तर अनेक पती-पत्नीतील वाद हा थेट न्यायालयाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. शुल्लक कारणावरुन त्यांच्यातील मतभेद घटस्फोटापर्यत जावून पोहोचले आहे.
सोबतच आपल्या आजूबाजूला होत असलेल्या आत्महत्या हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. आपण समाज म्हणून या समस्येकडे न बघितल्यास सामाजिक स्वास्थ बिघडण्यास वेळ लागणार नाही व समाजव्यवस्था मोडकळीस येईल. त्यामुळे आता पुन्हा एकदा समाजात आता एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता निर्माण झाली आहे.

