महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रमध्ये प्रवेश करणार असून लोकशाहीच्या विचारांना ताकद देणाऱ्या या यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे.
महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास 381 किलोमीटरचा राहणार असून या दरम्यान दोन भव्य सभा देखील होणार आहेत. याबद्दलची उपरेषा माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली.
नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. नांदेड ते बुलढाणा दरम्यान 14 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार असून 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या यात्रेचे नांदेडमधील नियोजन करत आहे. महाराष्ट्रातील यात्रेचे पूर्ण नियोजन झाले असून या प्रवासादरम्यान यात्रा कळंबोलीला एक दिवसाची विश्रांती घेणार आहे.
दुसरी आणि शेवटची सभा 18 नोव्हेंबरला शेगावमध्ये होणार असून या अगोदर खासदार राहुल गांधी संत गजानन महाराजांचे दर्शन देखील घेणार आहेत.
यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 8 आणि 9 नोव्हेंबरला यात्रेत सामील होणार आहे तर शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध पक्षांचे बडे नेते देखील सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून जाणाऱ्या या यात्रेबद्दल अनेकांना उत्सुकता आहे यात्रेच्या 381 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान अनेक लोक या यात्रेत सहभागी होणार आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात देखील इतर राज्याप्रमाणे लक्षवेधी ठरेल.
देशहित आणि राज्य घटनेशी बांधिलकी मानणारा काँग्रेस पक्ष असल्याने यात्रेमुळे या विचारसरणीला ताकद मिळणार आहे. आज केवळ काँग्रेस पक्षासमोर संकटे नाहीत तर ही संकटे स्वातंत्र्य लढ्यातून ताऊन सुलाखून जी विचारसरणी निर्माण झाले आहे, त्या विचारसरणीसमोर संकटे आहेत. यात्रेच्या निमित्ताने या विचारसरणीला बळकटी मिळणार असून पर्यायाने त्याचा फायदा काँग्रेसला देखील होईल. 
आज सामान्य माणूस या यात्रेबद्दल उत्सुक आहे. मोबाईल अथवा इतर माध्यमातून ते यात्रेची माहिती घेत आहेत. राजकारणापलीकडील लोकही या यात्रेबद्दल उत्सुकता दाखवत आहे. या माध्यमातून निर्माण होत असलेली ऊर्जा सर्वत्र पोहोचेल असा विश्वास आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे यासह बेरोजगारीचा प्रश्न देखील गंभीर बनल्याने हे दोन मुद्दे यात्रेदरम्यान समोर येतील, असे थोरात यांनी म्हटले आहे.


