महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
चौथीही मुलगी झाली म्हणून पती-पत्नीने तिला विहीरीत टाकून मारले, मात्र बिबट्याने तिला पळवून नेल्याचा बनाव केला म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पती-पत्नीची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या पती-पत्नीची नांवे आहेत.

संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २१ जानेवारी २०१४ रोजी बिबट्याने आठ दिवसांच्या मुलीस पळवून नेल्याची घटना घडली होती. या चिमुरडीचा मृतदेह रामनाथ नामदेव कोटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला होता. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवयानी पाटील यांनी या घटनेचा तपास करत या मुलीच्या आईवडीलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी तपासात चौथी मुलगी झाल्याने आईवडीलांनीच तिला विहीरीत टाकून मारले आणि तिला बिबट्याने पळवून नेल्याचा बनाव केला असल्याचा निष्कर्षाप्रत आले.
सहाय्यक निरीक्षक देवयानी पाटील यांनी स्वत: फिर्यादी होत सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर या दाम्पत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास देवयानी पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी केला तर आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र निरीक्षक एस. वाय. सोमवंशी यांनी दाखल केले होते.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या वतीने ॲड. विवेक बोराडे यांनी काम बघितले. ॲड. बोराडे यांनी या खटल्यात ग्रामीण भागात शौचालयाची व्यवस्था नसल्याने आरोपी पहाटेच्या वेळी शौचास घराबाहेर गेले असताना या बालिकेला बिबट्याने पळविले. तसेच पहाटेच्या अंधारामध्ये विहिरीचा अंदाज न आल्याने ही बालिका विहीरीत पडली. असा बचाव आरोपीच्यावतीने वकीलांकडून करण्यात आला.

या खटल्यामध्ये एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायाधीश आमेटा यांनी समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती देण्यात आली.


