महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
फॉक्सकॉन, वेदांता सेमीकंडक्टर असे एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरणारी असून टेक्निकल शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी राज्यात रोजगार निर्मिती न होणे आणि येणारे उद्योग परराज्यात जाणे, यामुळे येथील बेरोजगारीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.
सह्याद्री महाविद्यालयामध्ये झालेल्या युवक करिअर मार्गदर्शन मेळाव्यात आमदार डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट व्यासपीठावर उपस्थित होते.
तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या तीन महिन्यात वेदांता, फॉक्सकॉनसह काही मोठे उद्योग गुजरात व इतर राज्यात गेले आहेत. राज्यातील कौशल्य आधारित शिक्षण प्रणालीमुळे बाहेर गेलेल्या उद्योगांमध्ये अनेक बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळाल्या असत्या. मात्र सरकारच्या धोरणामुळे उद्योग परराज्यात गेल्याने या संधी आपल्याला गमवाव्या लागल्या आहेत.
महागाई, बेरोजगारी देशातील सर्वात मोठे समस्या ठरत असताना केंद्र सरकार मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी युवकांना व्हाट्सअप व सोशल मीडियामध्ये गुंतवून ठेवत धार्मिक बाबींवर लक्ष केंद्रित करत आहे. अशा स्थितीत सध्याच्या तरुणांना बेरोजगारीची समस्या जाणवत नसली तरी येत्या काही काळातील हे फार मोठे संकट आपल्यासमोर आहे. सरकारने राज्यातील उद्योग वाढीकडे लक्ष देणे आवश्यक असून असे न घडल्यास भविष्यात बेरोजगारीचा उसळणारा आगडोंब घातक ठरेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक बाळासाहेब वाघ यांनी मानले.

