महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी नितीन गडकरी यांच्यासह दहा खासदारांचा राजीनामा मागितला जाणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे.
या संदर्भात समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी म्हटले आहे की, संसदेत या खासदारांनी विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी ठराव न केल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. विदर्भा संदर्भात खासदारांना प्रेम राहिले नसल्याने या खासदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना राजीनामा मागितला जाणार आहे. वेगळ्या विदर्भासाठी भुवनेश्वर मधील अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने ठराव केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं मात्र ते पाळले गेले नाही.
देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना देखील वेगळ्या विदर्भाचा विसर पडला आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीची त्यांना आठवण व्हावी यासाठी हे आंदोलन असल्याचे केदार यांनी म्हटले आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनमत चाचणी घ्यायला हवी, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यावेळी लहान राज्यांना भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य झाले पाहिजे. अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला महत्त्व येत आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली देखील आंदोलने केली जाणार आहेत. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड या राज्यांची निर्मिती झाली त्यावेळी कुठे लोकांचा पाठिंबा होता असा प्रश्न उपस्थित करत केवळ राजकीय तुकडे पाडण्यासाठी भाजपने ते केले. तर तेलंगणा राज्याचे निर्मिती फक्त जनआंदोलनातून झाली असून आता महाराष्ट्रातले देखील हीच परिस्थिती निर्माण झाल्याचे केदार यांनी म्हटले आहे.
यंदाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन करण्याची भूमिका विदर्भ राज्य समितीने घेतली आहे. विदर्भातील खासदार आणि त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र विदर्भ राज्य संदर्भातील भूमिका जाहीरपणे स्पष्ट करण्याची मागणी ॲड. वामनराव चटप यांनी केली होती. चंद्रपूर मध्ये वामनराव चटप आणि नागपूर मध्ये अरुण केदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे.

